Skip to main content

“माणुसकी – मनाला स्पर्श करणारी कथा”

माणुसकी

➖➖➖➖➖➖➖➖➖


“माणुसकी आणि करुणा यांवर आधारित मराठी कथा, संकटातही माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिरेखांची हृदयस्पर्शी कहाणी”



रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफरभाईंनी आपल्या पोराला, आसिफला, हाक दिली…

“ओ आसिफ… चल गाडीयां अंदर लगा.”

आसिफ मित्रासोबत गप्पा मारत होता. मित्राला _“चल उद्या सकाळी कॉलेजात भेटू”_ म्हणत त्यानं कटवलं व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला.

बारा बाय दहाच्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गिर्‍हाइकाच्या  गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही, हे त्यालाही ठाऊक होतं. त्यात बारीक पाऊस चालू झाला होता.

गाड्या लावून होईपर्यंत जफरभाईंनी सगळं सामान आत ठेऊन दिलं. हात धुतले व पोराकडे पाहिलं… त्यांना बरं वाटलं.

_‘आपण नशीबवान… पोरगं कॉलेज शिकतंय आणि धंद्यात पण आपल्याला मदत करतंय. नाहीतर आपल्या भावांची पोरं… सगळीजण गॅरेजच्या कामात… पण दहावीच्या पुढे एकपण शिकला नाही.’_

पाऊस आता वाढला होता. अजून वाढण्याआधी घरी पोहोचणं आवश्यक होतं.

दुकानाचं शटर ओढून कुलूप लावून जफरभाई वळणार, तोच एक तरुण जोडपं गाडी ढकलत त्यांच्या दरवाज्याशी आलं. बाइकवर आधीच जाऊन बसलेला आसिफ लगेचच म्हणाला,

_“दुकान बंद हुआ भाई…!”_

जफरभाईंनी आसिफकडे फक्त एक कटाक्ष टाकला.
त्यांनी समोर येत त्या जोडप्याला विचारलं,

_“काय झालं गाडीला?”_

तरुण सायलेन्सरकडे बोट दाखवत म्हणाला, _“गावातनं निगालो तवाच जरा गचके मारत होती… मिस्त्रीला दावायला वेळ नवता… जरा इमरजन्शी झाल्या…”_  बायकोकडे हात दाखवत तो म्हणाला, _“हिच्या गावी दत्तवाडला निगालतो… पण इथं नाक्यापर्यंत कसंतरी आलो आणि गाडी बंद पडली. तीन किलोमीटर ढकलत आणलीय… लवकर पोचायचय. हिचे आबा… म्हंजी वडील… लई शिरीयस हायेत. बघा जरा काही होतंय का काही करुन चालू…”_

जफरभाईंनी तरुणीकडे पाहिलं. तिच्या चेहर्‍यावरचे भावच सर्व सांगून गेले. त्यानं दोघांना छपराखाली आडोशाला घेतलं.

_“बघू…”_ म्हणत त्यानी बाईक स्टँडला लावून चेक केली. पेट्रोल बघितलं… ते अजून बरंच शिल्लक होतं. बराच वेळ किक मारून बघितली… गाडी सुरू होत नव्हती.

सगळ्या गोष्टी चेक केल्यावर उभं रहात ते म्हणाले, _“इंजिन सिझ झालंय… गाडीतलं सगळं इंजिन ऑइल लीकेज झालंय… तुम्ही तशीच गाडी मारली त्यामुळे इंजिन जॅम झालंय… वेळ लागंल दुरुस्त करायला. पूर्ण इंजिन खोलायला लागंल. आता जरी खोल्लं तरी सकाळपर्यंत होणार नाही काम. त्यात पाऊस आहे…कामगार घरी गेला आताच. आता नाही येणार रात्री.”_

त्या तरुणानं बायकोकडे पाहिलं. ती आता रडवेली झाली होती. नवर्‍याकडे पहात म्हणाली,

_“आता कसं करायचं… शेवटची बस पण गेली आता… नऊला!”_

तो तरुण काही बोलणार, इतक्यात त्याचा फोन वाजला. त्यानं फोन घेतला…

_“हां हॅलो… बोल सोपान… अरे हाय… वाटेत हाय… जरा गाडीला प्रॉब्लेम झालाय… दुरुस्त करुन येतोय… नाही पण… अरे हो, कळलं तस़ं लगोलग निघालोच की… बरं बरं… आमी लवकर येतोय… काळजी करू नका… तासाभरात पोचतो…”_

त्यानं फोन बंद करत बायकोकडे पाहिलं.

_“सारकं तुझं नाव घ्यायल्यात तुमचे आबा… लवकर या म्हणाल्यात… कंडिशन नाजूक आहे…”_

आता मात्र तिचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली. भरीस भर म्हणून पाऊस आता जोरात कोसळायला लागला. तिरका पाऊस आता दुकानाच्या छपरातून आत येऊ लागला.

तो तरुण जफरभाईंकडे आला व हात जोडत म्हणाला,

_“दादा, तुमीच मदत करा… लवकर काहीपण सोय होईल का बघा… रिक्शा… सुमो… कायपण… पैसे काय लागेल ते देतो तिथं पोचून…”_

जफरभाईंनी आसिफकडे पाहिलं. पोरानं मान हलवली.

_“अबी कोन जायेगा अब्बा? दत्तवाड बोलेतू ह्यांशे नही बोलेतो तीस किलोमीटर… और वोबी मेन रोडशे दस किलोमीटर अंदर… हजार दिये तोभी कोई नही जायेगा.”_

जफरभाईंनी मान डोलावली. मग विचार करुन म्हणाले,

_“अस्लम को फोन कर… रिक्शा लेकू आ बोल उसको.”_

_“अब्बा… ऐशे क्या कर रहे तुमे…? अस्लम मुंबई गया नत्ता क्या रहीमचाचा के साथ…? एअरपोर्ट छोडने… आजच रहीमचाचा का हज का फ्लाइट हत्ता… अस्लम कल आयेगा वाप्पीस…”_ आसिफनं आपला बाप पण काय या लोकांच्या चक्करमधे अडकतोय, अशा अविर्भावात उत्तर दिलं.

_“अरे हां…मै भूलही गया…”_ जफरभाई उद्गारले.

मग काहीतर सुचून त्याला चटकन म्हणाले, _“एक काम कर… तू इनकी गाडी दुकान मे लगा. कस्टमरकी एक गाडी निकालकू रख… मै दस मिनट मे आतूं…”_

त्या जोडप्याला धीर देत जफरभाई म्हणाले, _“तुमी थांबा… मी तुमची रिक्षाची व्यवस्था करुन येतो… खच्चून दहा मिनटात येतो.”_

असं म्हणत पोराला पुढे काही बोलायची संधी न देता त्याच्या बाईकवरुन जफरभाई पावसात भिजत निघून गेले.

आसिफनं त्या दोघांकडे एकदा _‘काय आफत आहे!’_ अशा नजरेने पाहिलं व दुकान उघडलं. एक गाडी बाहेर काढली व त्या जोडप्याची गाडी आत दुकानात लावली. ते दोघं अपराधी नजरेने त्याच्याकडे पहात होते.

दहा पंधरा मिनिटं गेली… तरुणीच्या गावातून पुन्हा फोन येऊन गेला. तिच्या आबांची अवस्था अजूनच खराब झाली होती. सगळे तिच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. मधेच एक रिक्षा दुकानासमोरून न थांबता निघून गेली. आसिफ त्याच्या मोबाईलवर गर्क होता.

तेवढ्यात अजून एक रिक्षा येताना दिसली. मुसळधार पावसामुळं दिसत नव्हतं पण रिक्षा दुकानाशी आली आणि ड्रायव्हर सीटवरुन जफरभाई स्वतः उतरले.

आसिफनं बापाकडे आश्चर्यचकित होत पाहिलं व विचारलं,

_“अब्बा… तुमीच जानेवाले रिक्षा लेकू… अबी ये बारीशमे…? पागल हुये क्या…??”_

_“क्यों…? गॅरेजशे पयले मै रिक्षा चलाता नत्ता क्या?”_ मग जोडप्याकडे वळून ते म्हणाले, _“चला, बसा भाऊ…बस ग पोरी.”_

ते दोघे रिक्षात बसले. तसा मुलाच्या बाजूनं आसिफ पण रिक्षात बसला.

_“अब्बा, मै भी आ रा… रस्ता मेरकू पता है… और वाटार से शॉर्टकट है, वो तुमकू पता नही होगा.”_

जफरभाई हसले व त्याला म्हणाले,

_“गाडी बाहर है, उसकू चेन लॉक कर… और ताला लगा. ये ले चेन और लॉक…”_ अस म्हणत जफरभाईंनी पायातली चेन आणि कुलूप काढून त्याला दिलं.

आसिफनं मनातल्या मनात बापाला मानलं.

_‘अब्बाला माहीत होतं, मी घरी जाणार नाही… रिक्षानं त्यांच्याबरोबरच जाणार… शेवटी, बाप बाप होता है’_

गाडी लॉक करुन ते निघाले. भयंकर पाऊस सुरु होता. समोरचं नीट दिसत नव्हतं. आसिफ समोर बघत त्याच्या अब्बांना रस्ता सांगत होता.

त्याला माहिती असलेल्या शॉर्टकटनं वाटारवरून घेत जफरभाईंनी एका तासात रिक्षा दत्तवाडला त्या तरुणीच्या घरी पोहोचवली.

घरासमोर थांबता क्षणी रिक्षातून उतरून ती तीरासारखी धावत ओरडतच घरात शिरली…

_“आबा, मी आले… मी आले, आबाऽऽ……”_

जफरभाईंच्या रिक्षाभोवती लोक जमा झाले. गावातल्या लोकांना सर्व हकीकत एव्हाना कळली होती. सर्वांच्या चेहर्‍यावर जणू देवाला पाहिल्याचे भाव होते. कुणीतरी पाणी व चहा घेऊन आलं व त्यांना प्यायला लावला.

दहा मिनिटं शांतता होती…

मग अचानक आतून मोठ्या आवाजात आक्रोश ऐकू आला. जफरभाईंनी आकाशाकडे पाहिले व निश्वास टाकत म्हणाले,

_“या अल्लाह…!!”_

थोड्या वेळानं त्या तरुणीचा भाऊ सोपाननं येऊन जफरभाईंचे हात हातात घेतले व म्हणाला,

_“मिस्त्री साहेब, तुमी दोघांनी देवासारखं काम केलं… दाजी व आमच्या बहिणीला टायमात आणलं… ते बी अशा पावसात… तुमचे लई उपकार झाले. तिला पाहून आमच्या आबानं जीव सोडला. जनमभर घोर लागला असता तिला, जर भेट चुकली असती तर… कशी परतफेड करू?”_ सोपान त्यांचे पाय धरायला वाकला.

_“अरे अरे… भाऊ, काय करताय…!!”_ त्याला अडवत जफरभाई म्हणाले, _“तुमच्या बहिणीच्या वयाची पोरगी आहे माझी पण… लगीन होऊन गेली सासरी. आता जर मी तुमच्या आबाच्या जागी व ती तुमच्या ताईच्या जागी असती तर अजून कुणीतरी हेच केलं आसतं… वेळ आली तर तुमीपण तेच केलं आसतं, जे आमी केलं.”_

रिक्षा स्टार्ट करत जफरभाईंनी रडणार्‍या ‘त्या’ तरुणाचा हात हातात धरत म्हटलं,

_“तुमच्या बायकोला सांभाळा… गाडी रिपेअर करुन ठेवतो तयार उद्या. या कधीपण, येऊन घेऊन जा दोन चार दिवसात, जमेल तसं…”_

लांब गेलेल्या रिक्षाकडे व नंतर तिच्या टेललँपकडे तो तरुण व सोपान दोघे पहात राहिले… ते दिसेनासे होईपर्यंत.

रिक्षानं आणून सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची त्यांनी दिलेली नोट परत करत जफरभाईंनी दिलेलं उत्तर त्यांच्या कानात अजून घुमत होतं…

*_“माणूस मरतो दादा… माणुसकी नाही…!!!_*
*_खुदा हाफीज…!”_*


आभार (लेखक - सुनील गोबुरे)

~~●○👌📚 📖 👍○●~~

Comments

Popular Posts

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का नुस्खा।

दादी माँ ने बताया "भूख बढ़ाने" का  नुस्खा। हमारे शरीर की अग्नि खाए गए भोजन को पचाने का काम करती है। यदि यह अग्नि किसी कारण से मंद पड़ जाए तो भोजन ठीक तरह से नही पचता है। भोजन के ठीक से नही पचने के कारण शरीर में कितने ही रोग पैदा हो जाते है। अनियमित खान पान से वायु पित्त और कफ़ दूषित हो जाते है।।जिसकी वजह से भूख लगनी बंद हो जाती है और अजीर्ण अपच वायु विकार तथा पित्त आदि की शिकायतें आने लगती है। Dadi maa ke asardar nuskhe jo bhukh badhate hai, swasthya sudharte hai aur pachan shakti majboot karte hai भूख लगनी बंद हो जाती है, शरीर टूटने लगता है, स्वाद बिगड जाता है। पेट में भारीपन महसूस होने लगता है। पेट खराब होने से दिमाग खराब रहना चालू हो जाता है अथवा समझ लीजिये कि शरीर का पूरा का पूरातंत्र ही खराब हो जाता है। इसके लिये मंन्दाग्नि से हमेशा बचना चाहिए और तकलीफ़ होने पर इन दवाओं का प्रयोग करना चाहिए। भूख नही लगने पर आधा माशा फूला हुआ सुहागा एक कप गुनगुने पानी में दो तीन बार लेने से भूख खुल जाती है। काला नमक चाटने से गैस खारिज होती है, और भूख बढती है। यह नमक पेट को भी साफ़ करता है...

Jolly LLB 3

Jolly LLB 3 नीचे  Jolly LLB 3 की समीक्षा सरल हिंदी में दी है: कहानी, अच्छाइयाँ-खामियाँ, कलाकारों का प्रदर्शन और कुल मिलाकर कौन-किसे पसंद आ सकती है इसका विश्लेषण आप नीचे पढ़ सकते है... परिचय नाम: Jolly LLB 3 निर्देशक: सुभाष कपूर मुख्य कलाकार: अक्षय कुमार, अरशद वारसी, सौरभ शुक्ला, अलावा हुमा कुरैशी, अमृता राव, गजराज राव, सीमा बिस्वास आदि शैली: कोर्टरूम ड्रामा + कॉमेडी + सामाजिक संदेश फिल्म का वक्त: करीब 157 मिनट कहानी: गाँव का एक किसान राजाराम सोलंकी होता है, जिसकी ज़मीन एक बड़े उद्योगपति (industrialist) हरिभाई खेतान द्वारा अधिग्रहित कर ली जाती है। किसान जमीन हार जाता है और दुख में जीवन समाप्त कर लेता है (आत्महत्या कर लेता है)। उसकी पत्नी जानकी अम्मा और दुर्भाग्य से पीड़ित बहू जमीन का बदला चाहती है। यह मामला अदालत तक पहुंचता है। दो वकील हैं - जॉली मिश्रा (अक्षय कुमार) और जॉली त्यागी (अरशद वारसी), जिनकी भूमिका शुरुआत में थोड़ी प्रतिस्पर्धात्मक होती है। मिश्रा पहले उद्योगपति का पक्ष लेते हैं क्योंकि पैसों की ज़रूरत है, लेकिन घटना की गंभीरता और किसान की पीड़ा देख कर उनकी नैतिक लड...

निर्णय

 ⚙️ 🈸 निर्णय ➖➖➖➖➖ काल साडेपाच चा गजर झाला आणि रोजच्या प्रमाणं तो दहा मिनिटं Snooze करून मी पांघरूण ओढून घेतलं.  पाच चाळीस ला परत एकदा फोनची केकावली ऐकली आणि आळोखे पिळोखे देत उठले कशीबशी अंथरुणातून.  नवरा गाढ झोपेत होता. मनात म्हटलं, किती नशीबवान प्राणी आहे यार! छान सात वाजता उठेल आणि स्वतःचं आवरून, डबा घेऊन पळेल ऑफिसला. इकडची काडी तिकडे नको करायला.  पूर्वी कौतुक वाटायचं त्याच्या या वागण्याचं… पण हल्ली संताप येतो आणि तिळपापड होतो माझा नुसता. चरफड होते, पण काय करणार? मीच सोकावून ठेवलंय सगळ्यांना.  तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि आणि केसाचा बुचडा बांधला पटकन. हात चटचट चालवायला हवे होते. वेळेत निघाले तरच महिला विशेष गाडी मिळते. थोडं टेकायला मिळतं बूड, चौथ्या सीटवर तरी. प्रातर्विधी उरकले पटापट, भसाभसा दात घासले यंत्रवत, आधण ठेवलं चहासाठी आणि कणकेचा डबा उघडला. सकाळी उठून कणिक भिजवायची म्हणजे चिडचिड नुसती! एकीकडे, कालच घरी येताना आणलेली, निवडलेली, फरसबी धुवून घेतली.  चहा घेऊन जरा बरं वाटलं. तात्पुरता दिलासा, थकलेल्या शरीराला आणि मनाला.  उसासा टाकून उठले, घड...